शिवाजी विद्यापीठाला कुलगुरू नसणे हे भूषणावह आहे का ? : आ. सतेज पाटील : शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरु पद रिक्त

शिवाजी विद्यापीठाला कुलगुरू नसणे हे भूषणावह आहे का ? : आ. सतेज पाटील :
शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरु पद रिक्त
सिंहवाणी ब्युरो कोल्हापूर :
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील सेक्शन 11(8) नुसार राज्यपाल तथा कुलपती यांनी शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती करणे आवश्यक होते. विद्यमान कुलगुरुंचा कार्यकाळ 6 ऑक्टोबर 2025 रोजी संपला आहे, पण यासंदर्भात आजअखेर ( 9 ऑक्टोबर 2025 ) कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवाजी विद्यापीठाला कुलगुरू नसणे हे भूषणावह आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सतेज पाटील यांनी उपस्थित केलेले काही प्रश्न
1) शिवाजी विद्यापीठाच्या 63 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरू पद रिक्त राहिले आहे. नेमकी कोणाची शिक्षणाबाबतची अनास्था याला कारणीभूत आहे?
2) छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या विद्यापीठाला कुलगुरू नसणे हे भूषणावह आहे का ?
3) ज्या दिवशी विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड होते त्याच दिवशी त्यांचा कार्यकाळ कधी संपतो हे ठरलेले असते. असे असूनसुद्धा पूर्णवेळ कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया करणे तर दूरच; पण प्रभारी कुलगुरूसुद्धा का नियुक्त केलेले नाहीत ?
4) कुठे नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र आमचा? हाच प्रश्न उद्विग्नतेने आम्ही का विचारू नये ?
18 नोव्हेंबर 1962 रोजी शिवाजी विद्यापीठाची स्थापना
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाची स्थापना18 नोव्हेंबर 1962 रोजी झाली..तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ साकारलं..गेली 62 वर्ष झाली शिवाजी विद्यापीठ या नावानेच विद्यापीठाची कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यात ओळख आहे..दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी भूमिका घेतली आहे..विद्यापीठाचं नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे..