देशात मुदतपूर्व निवडणुका कामाला लागा, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचे कार्यकर्त्यांना आवाहन : महाराष्ट्रात राज्यस्तरीय ‘व्होट चोर गद्दी छोड’ आंदोलनाची सुरुवात :

देशात मुदतपूर्व निवडणुका कामाला लागा, काँग्रेसच्या बड्या नेत्याचं कार्यकत्यांना आवाहन
महाराष्ट्रात राज्यस्तरीय ‘व्होट चोर गद्दी छोड’ आंदोलनाची सुरुवात
सिंहवाणी ब्युरो / नागपूर:
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपची मतचोरी उघडकीस आणल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे धाबे दणाणले आहेत. यामुळे पंतप्रधानांना पायउतार व्हावे लागणार असून देशात कधीही मुदतपूर्व निवडणूक होणार आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. यावेळी मतचोरी विरुद्धचे हे राज्यवापी आंदोलन घराघरात पोहचवा अशीही विनंतीही सपकाळ यांनी केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा मतदारसंघातून राज्यस्तरीय ‘व्होट चोर गद्दी छोड’ आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी सपकाळ बोलत होते.
‘त्या’ चोराला सर्वात आधी धडा शिकवला पाहिजे, बावनकुळेंवर निशाणा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, कामठीतील मेळावा हा सरकारला इशारा असून लोकशाहीला हात लावाल तर खबरदार. नागपूरमधून ७५ वर्षाच्या नेत्यांना खूर्ची खाली करण्याचे आदेश निघाले आहेत, त्यामुळे मोदींच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि तो दिवस दूर नाही की देशात मध्यावधी निवडणुका होतील आणि शिव, शाहु, फुले व आंबेडकरांच्या विचाराचे नवे सरकार येईल. ‘वोट चोर, गद्दी छोड’ हा काँग्रेसचा नारा असून आता गप्प बसून चालणार नाही. या लढाईत सर्वांनी सहभागी झाले पाहिजे, असे सपकाळ म्हणाले. भारतीय जनता पक्ष मतचोरी करून सत्तेत आला आहे. महाराष्ट्रात मतचोरीचा पहिला प्रयोग भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदार संघात झाला. ज्या कामठीत मतचोरीची सुरवात झाली त्या चोराला सर्वात आधी धडा शिकवला पाहिजे. वोट चोर, गद्दी छोड,चा पहिला धमाका कामठीत झाला असून तो देशभर पाहोचला आहे. आता या मतचोरांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही सपकाळ यांनी दिला.
आपण विजयी झालो असे विचारत होते
विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तोफ डागली, ते म्हणाले की, सरसंघचालक मोहन भागवत प्रत्येक दाम्प्त्याने 3 मुलांना जन्म द्यावा असे सांगतात परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार यादीत एका घरी 56 मुले दाखवण्यात आली आहेत आणि 10 बाय 10 च्या खोलीत 109 मतदार दाखवले आहेत. भाजपने मतचोरी करून महाराष्ट्रात 132 आमदार निवडून आणले आहेत. हे भित्रे लोक आहेत, वोट चोरी करून सत्तेत आले आहेत. भाजपाचे लोक एकमेकाला चिमटे घेऊन विचारत होते आपण विजयी झालो? भाजपाची सत्ता असल्याने मतचोरांना शिक्षा होणार नाही पण मतदार मात्र या मतचोरांना शिक्षा देणार आहे. महाराष्ट्रातील या मतदारचोरांना धडा शिकवला पाहिजे, जिल्हा परिषद निवडणुकीत मतचोरी करणाऱ्यांना धडा शिकवून त्यांची औकात दाखवा, असे वड्डेवार म्हणाले.
राज्यातील मातब्बर नेत्यांची हजेरी
विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील,
कामठीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आयोजित सभेला रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे, भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर, , उमरेडचे आमदार संजय मेश्राम, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री यशोमती ठाकूर आदी उपस्थित होते